ईव्हीएमविरोधात विरोधकांचा एल्गार, २१ ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा असं म्हणत राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ईव्हीएमविरोधात येत्या २१ ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्याची घोषणा यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसंच बॅलेट पेपरसंदर्भात महाराष्ट्रातील घरोघरी अर्जांचं वाटप करुन त्यांचं मत जाणून घेणार असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली.
कोणाला मतदान केलं, हे मतदारांनीही कळलं पाहीजे, यासाठी निवडणुक बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजे असं अजित पवार यावेळी म्हणाले. तर ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही, अमेरिका, जपाननं हे तंत्रज्ञान फेकून दिलं, मग आपण का वापरायचं असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील उपस्थित होते.


