निराशेचे मळभ दूर होऊन राज्यात बैल पोळा सण निश्चितच समृध्दी घेऊन येईल – अजित पवार
मुंबई : परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्यासोबत असणारे त्यांचे राजा-सर्जा म्हणजेच बैल. आज, बैल पोळा सण असून बैलांना पूजण्याचा दिवस. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. असे म्बैहणत राज्लयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी बांधवांना पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच, बैल पोळा कृषी संस्कृतीतला हा महत्वाचा सण आहे. राज्यावर दाटलेले कोरोना संकटाचे, निराशेचे मळभ दूर करुन बैल पोळा सण निश्चितच सगळीकडे उत्साह, चैतन्य, आनंद, समृध्दी घेऊन येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला. कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला’. याच कृतार्थ भावनेने राज्यभरातील शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात याची आठवण अजित पवार यांनी करुन दिली आहे.
ते लिहीतात, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था आजही कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. या कृषी संस्कृतीत शेतकऱ्याच्या बरोबरीने बैल राबत असतात. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.
शेतकऱ्यांचे बैलांप्रती भावनिक नाते असते. राज्यभरातील शेतकरी आपल्या प्रदेशानुसार तिथीनुसार येणाऱ्या अमावस्येला बैल पोळा सण साजरा करतो. काही ठिकाणी पोळा सणाला बेंदूर ही म्हटले जाते. जरी राज्यात हा सण वेगळ्या नावाने, वेगळ्या तिथीला साजरा केला जात असला तरी हा सण साजरा करण्यामागे सर्व शेतकऱ्यांची बैलांप्रती कृतज्ञतेची भावना सारखीच असते असेही अजित पवार म्हणाले.
सध्या राज्यभर चांगला पाऊस सुरु आहे, त्यामुळे पिकेही जोमात आहे, पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची चिंता कमी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात चांगले अन्न-धान्य पिकेल, निराशेचे मळभ दूर होऊन राज्यात बैल पोळा सण निश्चितच समृध्दी घेऊन येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

