मुंबई: वाशीतील घाऊक फळ बाजारात गुरुवारी कोकणातील हापूस आंब्याचे आगमन झाले. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील माजी संचालक संजय पानसरे यांच्याकडे हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पाच पेट्या दाखल झाल्या आहेत. आंब्याच्या पाच डझनांच्या एका पेटीला तब्बल दहा हजारांचा दर मिळाला आहे.
हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे. ”ही रक्कम म्हणजे शेतकऱ्यांनी केलेल्या प्रचंड परिश्रमांचा एक सन्मान आहे. कोकणातील आंबा बागायतदारासांठी बनवण्यात आलेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी मी मायको टीमचे अभिनंदन करतो” असा आनंद राजेश अथायडे यांनी व्यक्त केला.
राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी ‘Global Kokan’ आणि ‘MyKo’ या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. कोकणातील 10 आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम 5 मार्च रोजी अंधेरीतील मॅरिएट येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी ‘MyKo’ ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे.
राज्याचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चार शेतकऱ्यांच्या मुहूर्ताच्या पेट्या प्रत्येकी 25 हजार रुपये दर देऊन विकत घेतल्या. राजेश अथायडे यांनीच दुसरी पेटी 26 हजार, रमेश भाई यांनी 25 हजारमध्ये, सिंधुदुर्ग फार्मर प्रोड्युसरचे प्रसाद मालपेकर यांनी 15 हजारमध्ये, बांधकाम व्यावसायिक जगन्नाथ मोरे, आर्किटेक गणेश यादव, क्रिकेट कोच निलेश भोसले यांनी प्रत्येकी 12 हजारात पेटी विकत घेतल्या. लिलावात एकूण तीन लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 31 हजार रुपये प्रमाणे ही रक्कम समप्रमाणात दिली जाणार आहे.
यावर्षी सर्वच ठिकाणच्या आंब्याचा हंगाम दोन महिन्यांनी लांबला आहे. त्यामुळे सर्वांनाच हापूसची प्रतीक्षा होती. दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारी हापूस आंब्याची दोन ते चार पेट्यांची आवक यावेळी उशिरा सुरू झाली. लांबलेल्या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये येणारा आंब्याचा मोहोर आलाच नाही. त्यानंतर आवश्यक ती थंडी पडली नाही. त्यामुळे आंब्याला मोहोर धरला नाही. दिवाळीनंतरही पाऊस थांबल्यावर डिसेंबरच्या सुरुवातीला धरलेला मोहोर काही शेतकऱ्यांनी टिकवून ठेवला. त्यातून लागलेले आंबे आत्ता बाजारात आले आहेत. गुरुवारी देवगडच्या कुणकेश्वरमधील आंबा बागायतदार अरविंद वाळके यांच्या बागेतील आंबे बाजारात आले आहेत. यावर्षी मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात हापूस बाजारात पाहायला मिळणार नाही. एप्रिल ते मे हाच आंब्याचा मुख्य हंगाम ठरणार असल्याची माहिती संजय पानसरे यांनी दिली आहे.
राजश्री यादवराव, सुप्रिया मराठे आणि सुनैना रावराणे या तीन महिला उद्योजकांनी एकत्र येत कोकणातील परिश्रमी 100 शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी पिकवलेल्या हापूसचा ब्रँड बाजारात आणण्यासाठी ‘MyKo’ या मँगोटेक प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या पिकवलेला शेतातील अस्सल हापूस आंबा ग्राहकांना थेट घरपोच मिळणार आहे. प्रत्येक पेटीवर असणार्या विशेष QR code द्वारे ग्राहकांना या आंब्याची लागवड कोणत्या शेतात आणि कधी करण्यात आली, शेतकर्याने कसे परिश्रम घेतले, त्याची बाग याची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे पाहता येईल. ‘शेतकऱ्यांचे मनोबल वाढवत त्यांना त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदला देण्यासाठी मायकोचा जो हायटेक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. ” असे राज्याचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यावेळी म्हणाले.
कोकणातील हापूसबरोबर अलिबाग, जुन्नर, गुजरात, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमधूनही आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. मात्र, या सर्वच ठिकाणी पावसाचा फटका बसल्याने यावेळी आंबा कमीच येणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, जो आंबा येईल त्याला चांगला भाव मिळेल, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे.

