शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार !
अहमदनगर: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच नगरमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी थोड्याच दिवसांत राज्यामध्ये भाजपचे सरकार येणार आहे व नगरमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक आमच्या सोबत येणार आहेत, असा दावा केला आहे. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्यामध्ये बैठक झाली होती. या बैठकीनंतर ते बोलत होते.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिनंही पक्षांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र हे तीन पक्षाचं सरकार लवकरच पडेल अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. आता मात्र शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणी कॉंग्रेस या तिन्ही पक्षातील लोकं आमच्या संपर्कात असल्याचा दावा माजी मंत्री तथा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे
