व्यापा-यांना व्यवसायासाठी वेळ वाढवून द्या : भाजपाची मागणी
कोल्हापूर : छोटे विक्रेते, फेरीवाले, दुकानदार यांना सहा महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर आर्थीक उत्पन्नाची घडी बसण्यास मदत होणार असल्याने सर्व नियमांचे पालन करून सध्या दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु असतात. ती वेळ आता दसरा-दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर वाढवून व्यवसायासाठी, दुकाने सरू ठेवण्यासाठी रात्री नऊ वाजेपर्यंत परवानगी द्या, अशी मागणी आज भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.
गेली सहा महिने कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य नागरिक, हातावर पोट असणारे लोक, छोटे व्यापारी यांना याची सर्वाधिक आर्थिक झळ पोचली आहे. कायदा व सुव्यव्स्थेचे पालन करत छोट्या व्यवसायीकांनी लॉकडाऊन मध्ये प्रशासनास सहकार्य केले आहे. छोट्या व्यापाऱ्यांना वेळ वाढवून देण्याची मागणी भाजपने केली आहे.
सध्या अनलॉक ५ सुरु झाले आहे यामध्ये हॉटेल, मॉल, दुकाने, व्यापार, जिल्हा अंतर्गत व राज्य अंतर्गत प्रवास अशा अनेक गोष्टी पूर्ववत होताना दिसत आहेत. ५ ऑक्टोंबरपासून कोल्हापूरातील बार, हॉटेल्स सुरु करायला प्रशासनाने परवानगी दिली आहे. परंतु हे सर्व पर्याय खुले होत असतना छोट्या व्यवसायिक, दुकानदार यांच्यावर दुकाने ७ पर्यंत सुरु ठेवण्याच्या बंधनामुळे अनेक निर्बंध येत आहेत. लवकरच नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या मोठ्या सणांची सुरवात होत आहे. यासाठी नागरिक मोठ्या संख्येने खरेदी करत असतात, असे निवेदनात म्हटले आहे.