मुंबईसह अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट
पुणे: मुंबईसह अनेक जिल्ह्यांत आज यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर शनिवारनंतर कमी होणार आहे. मॉन्सूनचा मुक्काम 22 ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यानंतर तो परतण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे जिल्हा व घाटमाथा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोलीत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शुक्रवारीही कायम राहणार आहे.
गेल्या चोवीस तासांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सलग दुसर्या वर्षी सप्टेंबर शेवटचा टप्पा आणि ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवडा राज्यासाठी धोकादायक ठरला आहे. अजूनही पाऊस वाढणारच आहे.
दोन दिवसांपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणावर कमी दाबाचा पट्टा स्थिरावला आहे. हा पट्टा पुढील 48 तासांत मध्यपूर्व अरबी समुद्र ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे दक्षिण गुजरातकडे सरकणार आहे. त्यानंतर दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन त्यानंतर हा पट्टा ओमानकडे सरकणार आहे. परिणामी पावसाचा जोर ओसरणार आहे. राज्यात अजून 48 तास पावसाचा धुमाकूळ सुरूच राहील.



