मुंबई : परतीचा पाऊस आणि पुरामुळे राज्यातील काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे.
आतापर्यंत बॉलीवूडला वाचवण्याचं काम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेर घराबाहेर पडण्याचे शहाणपण सुचल्याची मिस्कील टीका शेलार यांनी केली. मुख्यमंत्री आज नुकसानग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. ते शेतीच्या बांधावर गेल्यामुळे बळीराज्याना त्याचा काहीतरी फायद होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा म्हणजे ‘देर आये, दुरुस्त आये’ अशाप्रकारचा असल्याचे शेलार यांनी सांगितले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विश्वासघाताने तयार झालेले हे सरकार आत्मविश्वास विरहीत दिसत आहे. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आत्मसन्मानाची भावना असणे सोईचे नाही. तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत द्यावी की केंद्राने हा मुद्दा महत्त्वाचा नाही. कुठूनही मदत मिळो, पण शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित असल्याचे शेलार यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांच्या संपादकांचे लेख हे अभ्यासावर आधारित असतात. मात्र, ‘सामना’चे लेख व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीमधून घेतलेल्या माहितीच्याआधारे प्रकाशित केले जातात. बांगलादेशचा जीडीपी भारताच्या ११ टक्के आहे. ‘सामना’कडून त्या देशाची तुलना भारताशी केली जाते. हे अयोग्य आहे. रावसाहेब दानवे यांनी हे सरकार येरागबाळ्याचे असल्याचे म्हटले होते. पण हे सरकार केवळ येरागबाळ्याचे नव्हे तर बदमाशांचेही आहे, असे शेलार यांनी म्हटले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलेल्या नाराजीविषयी आशिष शेलार यांना विचारणा करण्यात आली. परंतु, अमित शाह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांनी टिप्पणी करणे योग्य नसल्याचे सांगत शेलार यांनी या मुद्द्यावर बोलणे टाळले.
