आज कोणतीही घोषणा करणार नाही – मुख्यमंत्री
सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. अतिवृष्टीत ज्या शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे, शेतीलतील पीकं, जनावरं वाहून गेले आहेत, त्यांना काही रकमेचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरात शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी आज शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी लोकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी सांगितले की, “पुरग्रस्तांना आणि नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे. तसेच, पुढील २ दिवस पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. आणि त्यानंतरच मदतीची घोषणा केली जाणार आहे. आज कोणतीही घोषणा होणार नाही. दरम्यान, केंद्राकडून मदत मिळणार असल्याचे आश्वासन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे”, अशी माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिली आहे.
आजच मला परिस्थिती कळली असं नाही. पावसाला सुरुवात झाल्यापासून यंत्रणेच्या संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, पाऊस किती पडतोय याची माहिती सातत्याने घेत होतो. आर्थिक मदतीच्या मुदतीवरून राजकारण करु नये. सर्वांनी एकत्र मिळून राज्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली पाहिजे. केंद्र सरकार हे देशाचं सरकारं आहे परदेशातलं नव्हे, राज्यांची काळजी घेणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे.नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत”.
“तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे. राज्यातील अतिवृष्टीचा धोका अजून सरलेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे लोकांनी गाफील राहू नये. सर्वप्रथम स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच, केंद्राने पक्षपात न करता मदत करावी”, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.