सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलकांनी आज महावितरणला ठोकले टाळे
कोल्हापूर :- लॉक डाऊन काळातील 300 युनिटपर्यंतची घरगुती वीज बिल माफ करा या मागणीसाठी आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलकांनी आज महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. त्यानंतर मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने याठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले. वीज बिल माफीसाठी सरकारला दिपावलीपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला असून यापुढे रस्त्यावरचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही सर्वपक्षीय कृती समितीन दिला आहे.
लॉकडाऊन काळातील वीज बिलांच्या माफीसाठी यापूर्वीही आंदोलने, मोर्चे, निवेदने देण्यात आली आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. 13 जुलै रोजी लॉकडाउन काळातील वीजबील माफीसाठी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर राज्यव्यापी आंदोलने करण्यात आली. तर वीज बिलांची होळी करून राज्य सरकारकडे लॉक डाऊन काळातील वीज बिले माफ करण्याबाबत निवेदन देण्यात आली होती. राज्यातील सुमारे बावीस जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गावपातळीवर, तालुका पातळीवर आणि विविध महापालिका क्षेत्रामध्ये विजबील माफीसाठी आंदोलने झाली.
मात्र सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. 20 ते 30 टक्के सवलत देण्याची घोषणा झाली. मात्र, ही अपुरी सवलत मान्य नसून तीन महिन्याची संपूर्ण वीज बिले माफ करा, अशी आग्रही मागणी करत 10 ऑगस्ट रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली होती. तरीही गेल्या तीन महिन्यापासून वीजबिल माफी संदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. आज सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मारत गनिमीकावा करत आंदोलन केले.
१०वाजता घोषणा करून, आंदोलकांनी सकाळी नऊ वाजताच महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक मारली, प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. काही वेळानंतर या ठिकाणी पोलिस दाखल झाले. यावेळी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट देखील झाली. त्यानंतर मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत या आंदोलकांना ताब्यात घेतले.
थेट मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या मांडला. यामुळे पोलिसांचीही काही वेळे तारांबळ उडाली होती. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार, माजी नगरसेवक बाबा पार्टे, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, अशोक पोवार. राजेंद्र सूर्यवंशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, एड.राजेंद्र सूर्यवंशी, जयकुमार शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होते.