नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे, दिवाळीसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन जारी
मुंबई : राज्यात कोरोनाचा आलेख खाली येत असतानाच राज्य शासनाची चिंता दिवाळीमुळे वाढली आहे. लोकांची गर्दी वाढेल आणि एकत्र येणंही वाढेल त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.
गृह विभागाकडून याबाबत परिपत्रक जारी करुन नागरिकांना यावर्षी साध्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित करता येऊ शकतील, अशी सूचना राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
गृह विभागाने दिवाळीसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना.
- दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
- दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.
- सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा
- धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.
दरम्यान, दिल्ली आणि पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या राज्यात दिवाळीत फाटके फोडण्यास बंदी घातली आहे. थंडीच्या वातावरणात फटाक्याच्या प्रदुषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने या राज्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेनेही यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.आहे.