मुंबई : ग्रामपंचयात निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमाकांचा पक्ष ठरला असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत. भाजपा नेत्यांकडून वारंवार कोकणात मिळालेल्या भरघोस यशाचा उल्लेख केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असतानाही रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं, पण आता मोठं यश मिळालं, असे म्हटलं आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनीही महापालिकांमधील भाजपाच्या विजयाची पायाभरणी असल्याचे म्हटले आहे.
आशिष शेलार यांनी व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला अभुतपूर्व यश मिळालं आहे. कोकणातल्या जनतेने तर भरभरुन दिलं आहे. एकट्या सिंधुदूर्गात ४५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपा जिंकली. २० ठिकाणीच शिवसेनेला यश मिळालं. राष्ट्रवादीला तर एखादं मिळालं ते नशीब. सिंधुदुर्गात भाजपा आणि रत्नागिरीत तर ५३६ च्या वर भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. त्यामुळे जिलेबी फाफड्याचे राजकारण जे करु पाहत होते. नौटंकी करु पाहत होते त्यांना मालवणी खाजाने उत्तर दिलं”.
“सिंधुदुर्गात, रत्नागिरीत केवळ भाजपा याचा अर्थ आता मुंबई, ठाणे आणि मुंबई महापालिकांमध्ये भाजपाचा झेंडा लागेल. ही मुहूर्तमेढ झाली, भाजपाच्या विजयाची नांदी झाली,” असं म्हणत आशिष शेलार यांनी कोकणवासीयांना धन्यवाद दिले. “नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महापालिकांमध्ये भाजपाच्या विजयाची ही पायाभरणीच आहे,” असे ते म्हणाले.
याआधीही आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेला टोमणा मारला – “कणकवली विधानसभा ३९ पैकी २७ तर सावंतवाडी १६ पैकी ९ तसेच कुडाळ १५ पैकी ९ अशा एकूण ७० पैकी भाजपाने ४५ ग्रामपंचायती जिंकल्या तर सेनेला केवळ २० आणि राष्ट्रवादीला १ ग्रामपंचायत जिंकता आली. सिंधुदुर्गात भाजपाचाच आवाज! कोकण म्हणजे “आम्हीच” म्हणणाऱ्यांचे कोकणी माणसाकडून गर्वहरण!”
“रत्नागिरीतील दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील १४९२ उमेदवारांपैकी भाजपाचे ५३६ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले तर ५९ गावात भाजपाचे सरपंच बसणार! रत्नागिरीतही घवघवीत यश! शिवसेनेचा आभासी फुगा फुटला कोकणात भगवा फडकला पण तो भाजपाचा,” असंही ट्विट त्यांनी केले.
