राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची आधुनिक साधनसामग्री असलेल्या बोटी व शोध, बचाव साहित्याची मागणी होणार पूर्ण – मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख
मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत सन 2019 चा अद्ययावत राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यात दुष्काळ सौम्यीकरण उपाययोजनांचा समावेश करण्यात आला असून त्यांचा पुढील वर्षी जिल्ह्याच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य आपत्ती आणि जिल्हा आपत्ती या दोन्ही व्यवस्थापन आराखड्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
‘राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत (NDRF) शोध व बचावाचे काम करण्यात येते. परंतु ही यंत्रणा आपत्तीच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत तात्काळ प्रतिसाद मिळत असतो. हा प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा असतो. यासाठी आधुनिक साधनसामग्री असलेल्या बोटी व शोध, बचाव साहित्याची मागणी असलेल्या जिल्ह्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून लवकरच ते देण्यात यावेत’, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.
या बैठकीला मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, मंत्रालय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक अभय यावलकर, आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. रवी सिंन्हा उपस्थित होते.