Facebook इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा, भाजपाशी लागेबांधे; पक्षपाताचा आरोप
फेसबुक इंडियाच्या पॉलिसी हेड अंखी दास यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर मागील काही दिवसांमध्ये भाजपाशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यांची नुकतीच संसदीय समितीनेही चौकशी केली होती. एका वृत्तवाहिनेने काल रोजी त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त दिले आहे.
फेसबुकवर भारतात पक्षपाताचा आणि द्वेषपूर्ण भाषणांवर कारवाई न करण्याचा आरोप झाला होता. यात अंखी दास यांचं नाव चांगलंच चर्चेत आले. त्यांच्यावर भाजपाशी लागेबांधे असल्याचा आरोप झाला.
अंखी दास यांनी त्यांची फेसबुक आणि सरकारकडून झालेल्या चौकशीनंतर एक आठवड्याने राजीनामा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर राजकीय पोस्टच नियंत्रण कशाप्रकारे होते यावरुन फेसबुकवर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतात फेसबुकचे ३०० मिलियन पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.
मागील आठवड्यात अंखी दास यांची डाटा प्रायव्हसीच्या मुद्द्यावर संसदीय समितीने जवळपास २ तास चौकशी केली होती.
दरम्यान, ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने अंखी दास यांनी सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्ण भाषणांवर कारवाई न केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर अंखी दास यांच्यावर टीका झाली. संसदीय समितीसमोर चौकशीसाठी हजर होताना देखील अंखी दास एकट्या हजर झाल्या नाहीत. त्यांच्यासोबत कंपनीचे बिजनेस प्रमुख अजीत मोहनही होते.

