Health & Fitness

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, परभणीत अलर्ट जारी

परभणी: कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करत असताना आता देशात बर्ड फ्लूने पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. देशातील 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा पैलाव आढळून आल्यानंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. परभणी जिल्ह्यातील 3 दिवसांपूर्वी मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. येथील जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून मुंरुबा गावातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, येथील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील ठाणे, लातूर, परभणीसाऱख्या भागामध्ये गिधाड, बगळे, कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत होत्या. राज्यात अद्याप बर्ड फ्लूचा प्रदुर्भाव झाला नसल्याचे राज्य सरकारने सांगितलं होतं. मात्र, आता परभणी जिल्ह्यातील मरुंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे समोर आले आहे. 3 दिवसांपूर्वी मुरुंबा येथे 800 कोंबड्या मरण पावल्या होत्या. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने मध्ये प्रदेशमधील भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यानंतर या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, परभणीमधील मुरुंबा गावात बर्ड फ्लूच्या केसेस आढल्यामुळे येथील प्रशासन सतर्क झाले आहे. मुरुंबा गावातील 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी टाकण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. शिवाय गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या भागात कुक्कुटपालकांची संख्या मोठी आहे. मुरुंबा, असोला या भागात 10 हजारपेक्षा अधिक कोंबड्या आहेत. या कोंबड्याच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीवर दहा किलोमीटर परिसरात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

मुरुंबा गावातली सर्व पक्षी नष्ट करण्यात येत असले तरी संपूर्ण परभणी जिल्ह्यात अलर्ट घोषित करण्यात आलाय. जिल्हाप्रशासन परभणी जिल्ह्यात पक्ष्यांचा सर्वे करणार आहे. इतर कुठे बर्ड फ्ल्यूचा प्रसार झालाय का याची माहितीसुद्धा प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button