आरे कारशेड स्थलांतरावरचे लक्ष वळवण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ची चौकशी : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : आरेमधील कारशेड हलवणे सरकारच्या अंगाशी आले आहे. यावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी ‘जलयुक्त शिवार योजने’च्या चौकशीचा मुद्दा समोर आणला आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
सरकारवर हल्ला करताना चंद्रकांतदादा म्हणालेत, आम्ही घेतलेले निर्णय केवळ आकसापोटी रद्द करण्याचा सपाटा या सरकारने सुरु केला आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बिनधास्त करा. दोषी असतील त्यांच्यावर कारवाईही करा मात्र, ही योजना केवळ सरकारची नसून यामध्ये लोकसहभाग देखील होता हे लक्षात घ्या.
०. १७ टक्के नमुन्यांवरुन संपूर्ण योजनेबाबत तर्क लावणे चूक आहे. यामध्ये लोकांनी आणि सामाजिक संस्थांनी देणगी दिली आहे. त्यांची देखील तुम्ही चौकशी करणार का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. त्यांनी आव्हान दिले – तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारा या योजनेचा फायदा झाला आहे की नाही. आमीर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे त्यांना विचारा, त्यांनी किती काम केले आहे. केवळ आकसामुळे चौकशी करणे चूक आहे.
