मराठा समाज आक्रमक, १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा!
कोल्हापूर: मराठा आरक्षणावरुन आता मराठा समाज जास्त आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी आणि मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा येत्या ६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करू, असा तीव्र इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिला आहे.
कोल्हापुरात आज मराठा समाज समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन समितीचे आबा पाटील यांनी हा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका बाहेर येत नसल्याने तरुणांमध्ये संभ्रमाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय घ्या. त्यानंतर मात्र, ६ ऑक्टोबर रोजी आम्ही मातोश्रीसमोरच आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी दिला आहे. तसेच, १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचाही इशारा देण्यात आला आहे.
