डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाखांची तर जखमींना ५० हजारांची तातडीची मदत
डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात येईल तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च शासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुंबईतील डोंगरी परिसरात काल (दि. १६) सकाळी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. दुर्घटनास्थळी बचाव व मदत कार्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्यासोबत योग्य समन्वय राखण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दिले होते.
मुंबईतील डोंगरी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे.
या दुर्घटनेत महिला व लहान मुलांसह निरपराध लोक सापडले आहेत तसेच काही लोकांना आपला जीव गमवावा लागला, ही अत्यंत क्लेशदायक गोष्ट आहे. सर्व मृत व्यक्तींच्या नातलगांना मी आपल्या शोकसंवेदना कळवतो तसेच सर्व जखमी व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

