दूरदर्शन आणि आकाशवाणी देणार विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
मुंबई : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र, किती दिवस टाळेबंदी ठेवायची, आर्थिक बाजूने ते झेपणारे नाही म्हणून सरकार हळूहळू काही ठिकाणी टाळेबंदी शिथिल करत आहे. अनेक ठिकाणी व्यवहार सुरू झाले आहेत. चौथा लॉकडाऊनही ३१ मे रोजी संपत आहे.
असे असले तरी मुलांच्या शाळा सुरू करणे धोक्याचे ठरू शकते म्हणून यंदाचे शालेय वर्ष मुलांचे घरातच जाणार आहे. शाळा, वर्ग आता थेट घरातल्या टीव्हीवरच भरमार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन मुलांना शिक्षणाचे धडे देणार आहेत. खरे तर, जून महिना सुरू झाला की, पालक, मुलांना शाळेचे वेध लागणे सुरू होते. मात्र, यंदा कोरोनामुळे शाळा, वर्ग प्रत्येकाच्या घरीच भरणार आहे.
त्यासाठी राज्य सरकारने दूरदर्शनचे १२ तास, तर रेडिओचा दोन तासांचा वेळ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

राज्यशिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला या संदर्भातील पत्र पाठवले आहे. “राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांचे डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केले आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे.” असं वर्षा गायकवाड यांनी पत्रात म्हटलं आहे.
“दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरून शिक्षण प्रसारण केल्यास गावखेड्यातील मुलांसाठी सोयीचं ठरेल. कारण ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी स्मार्टफोन किंवा विशिष्ट प्रणाली असणं आवश्यक ठरतं. त्याचबरोबर चांगली इंटरनेट सुविधाही लागते. त्यासाठी खर्च करावा लागतो. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी गरीब घरातून येतात. त्यामुळे त्यांना या गोष्टी करणं अशक्य आहे. म्हणूनच कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये, असा सरकारचा विचार आहे. ” असे वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

