मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय !
मुंबई: राज्यात करोनाच्या आजारानं पुन्हा एकदा उचल खाल्ली असून प्रशासन कामाला लागलं आहे. संसर्ग आटोक्यात राहावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्व सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. तर, जनतेलाही दक्ष राहण्याचं आवाहन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी आपले सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद सोशल मिडीयावरून साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. मास्क घाला आणि लॉकडाऊन टाळा असही आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं दिसत आहे. दिवसाला सहा ते सात हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. गर्दी होईल अशी कुठलीही कृती राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
त्यांनी या बाबतीत ट्वीट करत असे सांगितले की, “करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसंच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत”. छगन भुजबळ , यांची सुद्धा कोरोना टेस्ट सकारात्मक आल्याने त्यांनीही जनतेला सूचित केले आहे.
