मुंबई – आझाद मैदानात सोमवारी विनाअनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी लाठीमार केला. शिक्षकांचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार शोभतो का असा सवाल शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार व शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्याची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांनी केलेला लाठीमाराचे कृत्य हे अशोभनीय असल्याचे डॉ. मनिषा कायंदे यांनी म्हटले. या संपूर्ण घटनेचा आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी तीव्र शब्दांत जाहीर निषेध नोंदवला आहे.
राज्यातील विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी अर्थ विभागाने तरतूद केली. त्यासाठी नेमलेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर आठ दिवसांत कॅबिनेटची बैठक घेऊन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देण्यात आले होते. येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षकांचे वेतन सुरू होईल, या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनपूर्तीसाठी मंत्रालयात कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नव्हती. यामुळे पुन्हा अनुदानाची आशा मावळलेल्या शिक्षकांनी मुंबईत आझाद मैदानावर गेल्या चार दिवसापासून अर्धनग्न आंदोलन केले. अखेर शिक्षकांनी आझाद मैदानातून थेट मंत्रालायवर मोर्चा नेत असताना पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी थेट शिक्षकांवर लाठीमार केला.
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून मुंबई पोलीस आयुक्तांनी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी केली आहे.



