मुंबई, दि. २७ (विशेष प्रतिनिधी)- सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सरकार चिदंबरम यांच्यासारख्या विरोधकांनाच ब्लॅकमेलिंग करत नाही तर आता हे लोण पक्षांतर्गत विरोधकांपर्यंतही पोहोचले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतही हे लोण पोहोचण्याची शक्यता आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केला.
सध्या सरकार दबावतंत्राचा वापर करत आहे. हे सरकार आरएसएसचे प्यादे आहे. हे प्यादे कधीही मोडले जाईल. आपल्यालाही ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाला. नक्षलवाद्यांबरोबर आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आपण त्यांना पुरून उरलो. या दबावतंत्राला मी घाबरत नाही. मी स्वतंत्र भारतात जन्मलो आहे आणि माझ्या मागे एक वलय आहे, असेही ते म्हणाले. राज्य सहकारी बँकेचे प्रकरण 2 जी घोटाळ्यासारखे होऊ नये ही अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे त्या प्रकरणात सरकारने पुरावे सादर केले नाहीत आणि कोर्टाला याची वाट पाहवी लागली अस होऊ नये, असेही ते म्हणाले.
येत्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर जायचे की नाही, त्याचप्रमाणे काँग्रेसला आमच्या अटीशर्ती मान्य आहेत की नाही, हे सारे येत्या ३१ ऑगस्टपर्यंत निश्चित केले जाईल. एमआयएमबरोबरची आमची युती कायम राहील. त्यांच्याबरोबरच्या जागावाटपाची चर्चा फक्त असुद्दीन ओवैसी यांच्याबरोबरच केली जाईल, असे सांगत त्यांनी इम्तियाझ जलील यांच्या मागणीकडे आपण लक्ष देत नसल्याचे सूचित केले.
ओबीसींना एससी-एसटीप्रमाणे स्कॉलरशिप
वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जाईल व क्रिमिलेयर काढण्यासाठी शासनस्तरावर एक अभ्यास गट नेमला जाईल. या अभ्यासानंतर जो निर्णय येईल त्या पद्धतीने तत्काळ अंमलबजावणी केली जाईल. ज्याप्रमाणे अनुसूचित जाती-जमातींचे वेगळे बजेट आहे तसेच ओबीसींचेही स्वतंत्र बजेट करून त्यांच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फ्रीशिपही दिली जाईल. त्यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद करताना स्कॉलरशिपसाठी वाढीव महागाई निर्देशांकानुसार ती ठरवण्यात येईल, असेही आंबेडकर म्हणाले.



