परप्रांतीयांची वाट न बघता स्थानिकांच्या रोजगारासाठी सरकारचे प्रयत्न – अजित पवार
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवायचा का, बाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला जाईल, तसेच संकटात सापडलेल्या राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारतर्फे लवकरच पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हे. औंध रावेत उड्डाणपूलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
केंद्र सरकारने जाहीर केलेले २१ लाख कोटी कोणाला भेटणार या बाबत अनेक मतप्रवाह आहे. काही तर म्हणत आहे नुसतेच मोठमोठे आकडे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार आहे. असेही ते म्हणाले.
लाखो मजूर आपल्या राज्यात परत गेले आहेत. आता त्यांची वाट बघण्यापेक्षा आता स्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी स्किल देण्याची गरज असेल तर राज्य सरकार त्यासाठी तयार आहे. त्यासाठी स्वतः प्रयत्न करणार. त्यातून राज्यातील बेरोजगारी कमी होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच राज्यात असलेल्या रेड झोन भागात खबरदारी घेऊन अटी शिथिल करुन जास्त मुभा देणं गरजेचं आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली.
दरम्यान, लोकभावनेचा आदर करून आषाढी वारीवर ओढवलेल्या कोरोनाच्या संकट लक्षात घेऊन त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि राज्यात जाण्याची प्रत्येकाला मुभा आहे. फक्त नियम पाळा आणि चालत जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलं.
दरम्यान, लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत असताना त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

