आदित्य ठाकरेंची यात्रा; ‘जन आशीर्वाद’ घेत महाराष्ट्र पिंजून काढणार
लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार आहेत.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं आहे.
सध्या शिवसेना, भाजपामध्ये सगळं काही आलबेल असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र तरीही शिवसेना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणाच्या मनस्थितीत नाही. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक एकत्र लढणाऱ्या शिवसेना, भाजपाची युती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली होती. हा धोका टाळण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे.



