अनलॉक 5 मध्ये रेस्टॉरन्ट्स सुरू होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत
मुंबई : राज्यात आता अनलॉक-5 चा टप्पा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेस्टॉरन्ट्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेतली. राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुण्यासह औरंगाबाद, नागपूरमधील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. गेल्या सहा महिन्यांपासून रेस्टॉरन्ट्स बंद असल्याने प्रचंड नुकसान होत असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. रेस्टॉरन्ट्स सुरू करण्याची कार्यपद्धती ठरवली जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
कोरोनाच्या संकट काळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचं समाधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. “कोव्हिडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावं लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड लक्षणं दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पावलं टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते, ते आपण एक-एक करुन सुरु करत आहोत. व्यवहार बंद ठेवणे हा आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यांच्याकडून कररुपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची जाणीव असल्याने मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

