Maharashtra GovNCPPoliticsShivSenaमुंबई

पवारांच्या भेटीनंतर शिवसेना राज्यसभेत विरोधात जाण्याची शक्यता

मुंबई: कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या तीन विधेयकांना लोकसभेत मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकसभेत या विधेयकांच्या बाजूने शिवसेनेने मत टाकले. राज्यात सोबत असताना शिवसेनेने विधयेकाला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तातडीने भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यसभेत या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा सल्ला शिवसेनेला दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आज राज्यसभेत शिवसेना विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे.

राज्यसभेत या विधेयकांना शिवसेना व राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळावा म्हणून या दोन्ही पक्षांशी वरिष्ठ पातळीवरून संपर्क साधण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ते पाहता पवार-ठाकरे भेटीत याबाबतची चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. शिवसेनेनं शेतकऱ्यांचे हिट लक्षात घेता विधेयकाच्या विरोधात मतदान करावे, अशी सूचना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

खुद्द पवार यांना याबाबत विचारले असता अशी चर्चा झाली किंवा नाही, यावर ते काहीच बोलले नाहीत. आमच्या पक्षाने या विधेयकावर सभात्याग करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. कृषी हा राज्यांशी निगडीत विषय आहे आणि राज्यांच्या सहमतीशिवाय केंद्राने हे महत्त्वाचे विधेयक संसदेत आणले, याला आमचा आक्षेप आहे, असे पवार यांनी नमूद केले. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या वतीने कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे शंका उपस्थित झाली आहे.

दरम्यान, राज्यसभेत बहुमत नसल्याने केंद्रातील मोदी सरकारने ही विधेयके मंजूर करण्यासाठी नवी रणनीती तयार केली आहे. त्या अंतर्गत विरोधी पक्षांनाही विधेयकाच्या बाजूने आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी केंद्र सरकारकडून संपर्क साधण्यात आला आहे. विधेयकाशी संबंधित त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button