जानेवारीत शाळा सुरू होण्याची शक्यता, बच्चू कडूंचा प्रस्ताव
अमरावती : “कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात येताच साधारण पाच महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावलं उचलली गेली होती. शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिना संपत आला असतानाही शाळा सुरु करण्याबाबतचा कुठलाही विचार सरकारने केलेला नाही. आता मात्र शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात भाष्य केले आहे. कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. तर ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याची काही गरज नव्हती. कारण यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते. त्याशिवाय, उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन, जानेवारी महिन्यापासून शाळा सुरु करण्यात याव्या, असा प्रस्ताव मुख्यंमंत्र्याना दिल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.
ऑनलाइन शिक्षण चालू करण्याची काही गरज नव्हती. कारण, यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते. शिक्षण हे सार्वत्रिक असलं पाहिजे, सर्वांना समान मिळालं पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत या संदर्भात पाच ते सहा वेळा व्हीसी द्वारे बैठका झाल्या आहेत. सर्वांना १०० टक्के शिक्षक मिळालं पाहिजे याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षासाठीची उन्हाळ्याची सुट्टी रद्द करून जानेवारी पासून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत बोलताना दिली. कडू यांच्या या वक्तव्यामुळे आता जानेवारी महिन्यापासून शाळा सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.