संजय झा महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाकडून निलंबित
मुंबई: राजस्थानच्या राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळत असून काँग्रेस नेते संजय झा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाया व पक्ष शिस्तभंग यामुळे झा यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, गेल्यात महिन्यात संजय झा यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदावरून दूर करण्यात आले होते.
संजय झा यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने तसेच पक्षाची शिस्त मोडल्याने संजय झा यांना तत्काळ प्रभावाने पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. त्यात पायलट यांचे बंड न जुमानता काँग्रेस हायकमांडने गेहलोत यांच्यावर विश्वास दाखवला. पायलट व त्यांच्या समर्थक मंत्र्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आलं तसेच त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदही काढून घेण्यात आलं. या कारवाईनंतर पक्षाने पायलट यांची बाजू घेणाऱ्या पक्षातील अन्य नेत्यांकडे आपला मोर्चा वळवल्याचे संजय झा यांच्यावरील कारवाईने स्पष्ट झाले आहे.
संजय झा यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजस्थानबाबत पक्षाला सल्ला दिला होता. सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद देण्यात यावं आणि तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक गेहलोत यांना जिथे काँग्रेस कमकुवत आहे, त्या राज्यांची जबाबदारी देण्यात यावी, असे झा यांनी नमूद केले होते. राजस्थान प्रदेश काँग्रेसला नवं नेतृत्व मिळावं, असेही झा यांनी सुचविले होते. झा यांचा हा उपदेश पक्षाला पचनी पडलेला नसून त्यातूनच त्यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे.
Shri Sanjay Jha has been suspended from the Congress Party with immediate effect for anti-party activities and breach of discipline. pic.twitter.com/TaT0gWbCc7
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 14, 2020
संजय झा यांनी एका लेखाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पक्षात लोकशाहीचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यामुळे गेल्याच महिन्यात संजय झा यांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली होती. त्याचवेळी अभिषेक दत्त आणि साधना भारती यांनी राष्ट्रीय पातळीवर मीडिया पॅनलिस्ट म्हणून नियुक्त करण्यात आले होते.


