टोळधाड आता विदर्भात; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मुंबई :- पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्यप्रदेश मार्गे आलेल्या टोळधाडीने आता विदर्भात थैमान घातले आहे. नागपूर, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत धडक दिली आहे. या भागात संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचं या कीटकांनी मोठं नुकसान केलं . त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या टोळ म्हणजेच नाकतोडे. यांच्यापासून शेतांचे संरक्षण करण्यासाठी विदर्भात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातून हे टोळ सातपुड्याच्या पर्वतरांगांमधून नागपूर, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत पोहचले आहेत. नागपुरातले संत्रा उत्पादन तालुके असलेल्या काटोल आणि नरखेडमध्ये सोमवारपासून टोळधाड पडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तर अमरावतीतल्या वरूड, मोर्शी आणि वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.
हे कीटक एखाद्या तालुक्यात पोहचल्यानंतर रात्रीतून पाच ते सहा किमी परिसरातल्या झाडांचे नुकसान करतात. एखाद्या झाडावर हल्ला केल्यानंतर त्या झाडाच्या फांद्याच शिल्लक राहतात. पानं पूर्णपणे खाऊन टाकतात. सध्या विदर्भात पीक नाही. पण भाजीपाला आणि संत्रा, मोसंबी, लिंबू या झाडांच्या बागा उभ्या आहेत. त्यांना टोळांनी लक्ष्य केले आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार टोळधाडीचा शेतावर प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा हे उपाय :
- एका टोळधाडीत कोट्यवधी कीटक असतात.
- टोळधाडीचा शेतावर प्रादुर्भाव झाल्यास आगीचा मोठ्या प्रमाणात धूर करावा.
- शेतात मोठा आवाज करावा. डीजे, ट्रॅक्टरचे सायलेंसर काढून त्याचा आवाज, याचा उपयोग करता येईल.
- अनेकांनी एकत्र येऊन भांडी वाजवल्यानेही टोळ पळून जाण्यात मदत होईल.
- टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये क्लोरोपायरीफॉस ५० टक्के, साईपरमेथ्रीन ५ टक्के हे
- रसायन ३-४ मिली एवढ्या प्रमाणात मिसळून फवारणी करता येईल.
- टोळधाड खूप मोठी असल्याने फवारणीसाठी अग्निशमन दलाची गाडी किंवा ड्रोनचा वापर करावा.

