मुसळधार पाऊस पडूनही धरणात पाणीसाठा जैसे थे!
गेले काही दिवस राज्यभरात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला नवजीवन दिले. या पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी धरणांच्या पाणीसाठ्यात मात्र आवश्यक तितकी वाढ झाली नसल्याचे दिसत आहे. यंदा राज्यातील मुख्य धरणांमध्ये 17.52 टक्के इतकाच पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात मुसळधार पावसामुळे 28.77 टक्के इतकं पाणी जमा झालं होतं. मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशीव, परभणी या जिल्ह्यांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला.
मराठवाड्यातील मांजरा, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर या धरणांमध्ये जिवंत साठा शून्यावर पोहोचला. या साठ्यात पुढील 30 दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे कोकण विभागात 44 टक्के इतका उपयुक्त जलसाठा असून पुणे विभागात 27 टक्के इतका साठा उपलब्ध झाला आहे.