अतिवृष्टिग्रस्त भागाचा फडणवीस करणार दौरा; बारामतीपासून होणार सुरुवात
मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी मदतीचे उपाय सुचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागांचा तीन दिवस दौरा करणार आहेत.
१९ ऑक्टोबरपासून बारामती येथून दौऱ्याची सुरुवात होईल. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा या भागांची पाहणी करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. २० ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या या जिल्ह्यांतील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तर २१ ऑक्टोबर रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा दौरा करतील. या तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस हे नऊ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानीची स्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकर्यांना थेट मदत द्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्याला मदत मिळेल, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली पाहिजे, असे फडणवीस म्हणालेत.