चेन्नई येथे सुरु असेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भरातीय संघाची सुरुवात खराब झाली. या सत्रात भारतीय संघानं तीन गडी गमावले. यामध्ये अनुभवी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांचा समावेश आहे. युवा शुबमन गिल शुन्य धावसंख्येवर तंबूत परतला. मात्र, पहिल्या सत्रात रोहित शर्मानं चौफेर फटकेबाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला.
रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं उपहारापर्यंत २६ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १०६ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ८० धावांवर खेळत आहे. या खेळीदरम्यान रोहित शर्मानं १३ चौकार आणि एक खणखणीत षटकार लगावला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे ५ धावांवर नाबाद अजून जम बसलेल्या रोहित शर्माला साथ देत आहे.
रोहित, रहाणेकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा
सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील रहाणे धावांसाठी झगडत आहेत. त्यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा केली जात आहे. पहिल्या कसोटीत रोहितने दोन डावांत अनुक्रमे ६ आणि १२ धावाच केल्या. रोहितने ऑस्ट्रेलियात तिसऱ्या कसोटीत २६ आणि ५२ धावा केल्या, तर चौथ्या कसोटीत ४४ आणि ७ धावा केल्या. रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १ आणि ० धावा करता आल्या. तसेच ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या कसोटीत २२ आणि ४ धावा, तर चौथ्या कसोटीत ३७ आणि २४ धावा केल्या. इंग्लंडविरोधात रोहित शर्माला चांगली सुरुवात मिळाली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोन अनुभवी खेळाडूंकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे.
