मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे केलेले कौतुक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे; कारण ते बाहेर पडतात; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, अशी प्रतिक्रिया देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पण याबाबत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी बोलावे, असा सल्ला राज्यपालांनी दिला आहे. यावरून शरद पवार हेच राज्य चालवतात, हे स्पष्ट होते. शरद पवार घराबाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांनी बोलून काही उपयोग नाही, अशी चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. राज्य सरकारने आता एक एक गोष्ट उघडण्यासाठी काम करायला हवं.
गर्दी टाळण्यासाठी आराखडा तयार केला पाहिजे. मंदिरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाईन प्रवेश द्यावा, असेही पाटील म्हणाले . सध्या लोकांना शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं अशी लोकभावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे, असं सांगतानाच मी फक्त खुर्चीत बसतो. सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्हाला घ्या, असा करार ठाकरे-पवारांमध्ये झाला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
