मुंबई : आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षातील गळती रोखण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे . एकीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस नाशिकच्या मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी मिशन नवी मुंबईसाठी सरसावले आहेत .
नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमधील मतभेद दूर करण्यासाठी आशिष शेलार नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासोबत मंदा म्हात्रेंचे शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरु केली आहे .
गणेश नाईक राष्ट्रवादीत असल्यापासून नवी मुंबई आणि ठाणे या भागातील दिग्गज नेते आहेत. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता होती. गणेश नाईक आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.
2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेमुळे गणेश नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला. ते भाजप नेत्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभूत झाले. भाजपच्या तिकीटावर 2019 मध्ये ते ऐरोली मतदारसंघातून रिंगणात उतरले आणि विजयी झाले. मात्र एका पक्षात असूनही म्हात्रे आणि नाईक यांच्यात मतभेद सुरु आहेत .