१२ हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ; सौरऊर्जा वाढीसाठी उच्चस्तरीय समिती
मुंबई : राज्य सरकारच्या मालकीच्या विविध जलाशयांवर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी ऊर्जा आणि जलसंपदा विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी. राज्यात पुढील ५ वर्षांच्या गरजेनुसार किमान १० हजार ८९० मेगावाट सौर ऊर्जा निर्मिती आवश्यक आहे.
राज्यात सौरऊर्जा वाढीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती सौरऊर्जा निर्मितीचे सध्याचे स्रोत, नवे स्रोत आणि संभाव्य लक्ष्य याबद्दल आपल्या अहवालात शिफारशी करणार आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सौरऊर्जेची स्थापित क्षमता, नवीन प्रस्तावित प्रकल्प आणि या प्रकल्पांची अंमलबजावणी याबद्दल आढावा घेतला व सौरऊर्जा निर्मितीबाबत विशेष प्राधान्य देण्यास सांगितले. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राऊत यांनी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यांच्यासह मेडा यांची संयुक्त बैठक घेतली.
सौरऊर्जा वाढविण्यासाठी मेडा महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक संयुक्त अभ्यास समिती स्थापन केली. सौरऊर्जेच्या विविध स्रोतांमधून तयार होणाऱ्या विजेसाठी व त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे तांत्रिक, आर्थिकवनियामक इत्यादी सर्व पैलूंचा अभ्यास करून अहवाल सादर करावा, असे आदेश ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले.