२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापुरात श्रमिक पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून २३८ सदनिका बांधून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत राज्यात १५ ते २० लाख घरे बांधली जात असून हा उच्चांक आहे. येत्या २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पाच्या भूमिपूजनाप्रसंगी नगरविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह महापौर शोभा बनशेट्टी, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष यदू जोशी आदींची उपस्थिती होती.