मुंबई : ५ ऑगस्टला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भुमिपुजन सोहळा असल्याचे काल स्पष्ट करण्यात आलं. मंदिर समितीने याचे निमंत्रण निवडक जणांनाच दिल्याचे समोर आलं आहे. राम मंदीर निर्माणात पुढाकार घेणाऱ्या शिवसेनेला याचे निमंत्रण अद्याप आले नाही. त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना “भूमिपूजन” समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून बोलवावे अशी मागणी केली आहे. तर सेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी अयोध्या दौर्यासाठी कोणाकडूनही आमंत्रणाची गरज नाही, असे ठासून सांगितले आहे.
अयोध्येतील राम मंदिर भुमीपुजनास सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करावे असे पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिले आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला हे पत्र पाठवण्यात आलं आहे. श्रीराम मंदिराच्या निर्मिती लढ्यात उद्धव ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना निमंत्रित करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्या आणि शिवसेनेचं जुनं नातं असून ते राजकीय नाही. राजकारणासाठी आम्ही अयोध्येला जात नाही आणि गेलो नाही, असं स्पष्ट दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

