कोरोनाच्या 3 लशी विविध टप्प्यात, भारतीयांपर्यंत पोहोचवण्याची तयारी पूर्ण; पंतप्रधान मोदींची घोषणा
देशाचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिन आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पून्हा देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे म्हटले तसेच, भारत जरूर आत्मनिर्भर होईल असा विश्वास व्यक्त केला. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल, मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कोरोना लस कधी तयार होणार असा प्रश्न सतत विचारला जात आहे. वैज्ञानिक यासाठी सातत्याने मेहनत घेत आहे. देशामध्ये 3 लशी विविध टप्प्यामध्ये आहेत. कोरोनाची लस लवकरात लवकर भारतीयांपर्यंत पोहोचेल याची सर्व तयारी झाली आहे.
प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी रुपरेखा तयार आहे. आज भारतामध्ये एक नाही, दोन नाही तर तीन-तीन लशी यावेळी टेस्टिंगच्या टप्प्यामध्ये असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी यावेळी आश्वासन दिले की, जसे वैज्ञानिकांकडून लशीकरता हिरवा कंदिल मिळेल त्यावेळी मोठ्या स्तरावर या व्हॅक्सिनचे उत्पादन करण्याची देशाची तयारी आहे.
त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाच्या डिजीटल हेल्थ मिशन ची आज घोषणा केली. आजपासून या मिशनची सुरुवात होत असून आरोग्य क्षेत्रासाठी ही मोठी क्रांती असेल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, नागरिकांचा उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, त्यासाठी प्रत्येकाला एक आरोग्य कार्ड दिले जाईल. संबंधित नागरिकाच्या स्वास्थ्याबाबत त्यात माहिती असेल. यामुळे त्याला उपचार घेणे सोपे होईल.

