आता राज्यात लॉकडाऊन होणार नाही – राजेश टोपे
मुंबई : मार्च महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित झाले. राज्यात सध्या अनलॉकचा-५ वा टप्पा सुरू आहे. हळूहळू सर्व परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे पाहून आता अनलॉकमध्ये अनेक गोष्टी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात लॉकडाऊन होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितलं आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे १२,१३४ नवे रुग्ण आढळले. यामध्ये ३०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. देशात, राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट म्हणजे बरे होणा-या रुग्णांचा आकडा चांगला आहे.
कोरोनामुळं एका दिवसात ३५८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, तब्बल १५,५७५ रुग्णांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. राज्यात एका दिवसातील कोरोना रुग्णांची ही आकडेवारी पाहता एकूण रुग्णांचा आकडा १४,९३,८८४ वर पोहचली आहे. यामध्ये ३९,४३० मृत्यू आहेत, तर ११,९६,४४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्याच्या घडीला राज्यात २,४१,९८६ रुग्णांवर कोरोनासाठीचे उपचार सुरू आहेत. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे राज्यात कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं भर पडत आहे. परिणामी राज्याचा रिकव्हरी रेट ८१.१३ टक्क्यांवर पोहचला आहे.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना कोरोनाकाळातील सर्व नियम काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचं आहे. नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार , अशी नगरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
तसेच आता शाळा, मंदिरं टप्प्यांमध्ये उघडणार आहेत, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
