राज्यातील साखर कारखाने गाळपासाठी सज्ज : आठवड्यात भेटणार धुरांडी
पुणे : राज्यातील 180 पैकी दीडशेवर साखर कारखाने यंदाचा गाळप हंगाम घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच परतीच्या पाऊस थांबला असल्याने यंदाचा हंगाम निर्णय होईल अशी आशा आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद 2 नोव्हेंबरला होत आहे. एफआपी एकरकमी देण्याबाबत परिषदेत निर्णय होईल, त्यानंतर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची धुरांडी पेटतील. या आठवड्यापासून प्रत्यक्ष हंगामाला गती येण्याची शक्यता आहे.
राज्यात यंदा 10.66 लाख हेक्टर उसाचे विक्रमी क्षेत्र आहे. त्यातून सुमारे 8.50 कोटी टन ऊस गाळपास उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. उसाचे प्रचंड प्रमाण विचारात घेऊन राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी केलेली होती. मात्र, परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे यंदा साखर हंगाम लांबणीवर पडत चालला आहे. साखर हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू व्हायला आणखी किमान पंधरा दिवस लागतील.
केंद्र शासनाचे बदलते साखर धोरण, प्रामुख्याने साखरपट्ट्यात झालेला कोरोनाचा उद्रेक, ऊसतोडणी मजुरांच्या वाढत्या अपेक्षा, कोव्हिड सेंटरसक्ती यासह इतर अनेक अडचणींतून मार्ग काढत यंदा राज्यातील साखर कारखान्यांना गाळप हंगाम चालवावा लागणार आहे. आजअखेर राज्यातील 150 साखर कारखान्यांनी यंदासाठी गाळप परवाना मिळविला असून, काही कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवातही केली आहे. राज्यात यंदा जवळपास 180 साखर कारखाने गाळप हंगाम घेतील, असा अंदाज आहे.

