दहावी बारावी परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन ?
मुंबई: रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची आगामी लाट आणि तिला थांबवण्यासाठी करण्यात आलेले अधिनियम याबाबतीत नागरिकांशी सोशल मीडियावरून चर्चा केली. मास्क घाला आणि लॉकडाऊन टाळा अशी घोषणा देऊन त्यांनी नागरिकांना ८ दिवसाची मुदत दिली.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार की ऑफलाइनच होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, परीक्षेला अद्याप दोन महिने असून, परिस्थितीनुसार परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण राज्य मंडळाने दिले आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षा पुढच्या महिन्यापासून सुरु होणं अपेक्षित आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात आढावा घेतला होता. यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्याचा पर्याय असू शकतो का? परीक्षा ऑनलाईन घेता येतील का? अशी चर्चा करण्यात आली.
त्यावेळी शिक्षण विभागाने सांगितलं की, दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. ऑनलाईन परीक्षा घेतली, तर ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे जर परीक्षा घ्यायची असेल तर ती ऑफलाईनच झाली पाहिजे. परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार अशी त्यांनी भूमिका घेतली आहे.
माहितीनुसार, राज्यात १०वीचे १६ लाख आणि १२वीचे १४ लाख विद्यार्थी आहेत सध्यातरी तारखांमध्ये काहीही बदल करण्यात आला नाही आहे . पण परीक्षा या ऑफलाईनच घेण्यात येणार अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे.