पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
मुंबई : पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला. या दुर्घटनेची दखल घेत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे .
पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातील पूरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली.
घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे. मंगेश गोपाळ अभंगराव(वय ३५), राधाबाई गोपाळ (वय ५०), पिलू उमेश जगताप (वय १३), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय ७०) आणि दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याच्या कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर उपमुख्यंत्र्यांनी संबंधीत नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावेत. पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातील पुरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक वसाहतीत पाणी शिरल्याचा व झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. उपमुख्ममंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मदतकार्य तातडीने सुरु करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. हवामानखात्याने दिलेल्या इशाऱ्याची नोंद घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी. पोलिस व प्रशासनाने सतर्क रहावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हा व पोलिस प्रमुखांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे व बचाव, मदतकार्य तत्परतेने करण्याचे निर्देश दिले आहेत.