पवारांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम – संजय राऊत
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देशात फिरण्याचं सांगावं, शरद पवारांनी बाहेर पडून काम करा असे कधीही म्हटलेले नव्हते. त्यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री घरूनच काम करत आहेत. जर एकाच ठिकाणी बसून सर्व जिल्ह्यांची कामे होत असतील तर त्यात गैर काय? “उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखी आहे. ज्या प्रकारे प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? याचं भान जुन्या सहकाऱ्यांना नसेल तर अवघड आहे. ” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर केली. ‘सामना’ कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून राज्यातील मंदिरं उघडी करण्याची मागणी केली. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, मंदिरं उघडली जावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. सगळं बंद करण्याची त्यांना काही हौस नाही. अनेक मंदिरं आणि देवस्थानांनी कोविडशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
“मुंबईत काल अचानक कोरोना रुग्णांचा आकडा वाढला. महाराष्ट्र आणि देशातही वाढत आहे. त्याच्यात भर पडू नये आणि लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरून संकट वाढवू नये. लोकांच्या जीवाशी खेळू नका. संयम बाळगणं गरजेचं आहे. ” असं आवाहन करत त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनावर तोंडसुख घेतले.
“सरकारकडे मागण्या मांडण्याचा विरोधकांना अधिकार आहे. तेसुद्धा लोकशाहीचे, महाराष्ट्राचे घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवलं पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचं आहे हे माहिती असतानाही विरोधक असं वागत असतील तर हे जनतेच्या हिताचं नाही.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बदल्यांचा धंदा करतंय, असा आरोप केला आहे. यावर बोलताना राऊत यांनी म्हटलं की, “नवीन सरकार आल्यानंतर बदल्या करू नये असं घटनेत लिहिलं आहे का? बदल्या करू नका असं कोणत्या कायद्याच्या पुस्तकात लिहिलं आहे? तुमच्या लोकांनाच वर्षानुवर्ष ठेवून राज्य करावं का? बदल्या काय फक्त आम्हीच केल्या का ? बदल्या करून आम्ही काय नवीन चमत्कार केला का? मनमोहन सिंग यांचं सरकार जाऊन मोदींचं सरकार आलं तेव्हा बदल्या केल्या नाही का ? बदल्या राज्याच्या हिताच्या आहेत आणि तो करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे.” असे म्हणत राऊत यांनी फडणवीस यांना सुनावले.
उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा, असं सागण्याचं धाडस करावं, असं आवाहनच संजय राऊत यांनी केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखी आहे. ज्या प्रकारे प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? याचं भान जुन्या सहकाऱ्यांना नसेल तर अवघड आहे. ” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर उपचाराची शर्थ करण्यात आली. सगळ्याला, राज्य सरकारला लगेच जबाबदार ठरवू नये. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी पत्र लिहिणार असल्याचे राऊत म्हणाले.


