कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही : उद्धव ठाकरे
मुंबई : आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावलं टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेले नाही. अजूनही लढा संपलेला नाही. कोरोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनासोबत जगायला शिका असे जगभरात सांगितले जात आहे. सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली आहे. आरोग्य खराब कऱण्यासाठी नाही. आपण एकमेकांपासून अंतर ठेवले पाहिजे,” असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे असं लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल. पण महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे. जनता सरकारचं ऐकत आहे. म्हणून मी जनतेचे आभार मानतो. गर्दी टाळा, कोणत्याही परिस्थिती ती होता कामा नये,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आपल्याला करोनासोबत जगायला शिकलेच पाहिजे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे, स्वच्छता राखणे या गोष्टींचे पालन करावंच लागणार आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.
राज्यावर कोरोनाचे संकट असताना राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

