राज्यात १४,२३४ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
मुंबई: राज्यात ३४ जिल्ह्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्याच्या ग्रामीण भागाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने या निवडणुकीचा कौल सत्ताधाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मतमोजणी सोमवारी होईल. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे समजत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून आम्हीच जास्त जागा जिंकल्या, असा दावा केला जातो.
तसेच राजकीय पाया भक्कम करण्यासाठी सर्वच राजकीय नेते आपापल्या भागांमधील निवडणुकांमध्ये लक्ष घालतात. खासदारकी आणि आमदारकीसाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात असणे राजकीय नेत्यांसाठी आवश्यक असते. त्यामुळे या वेळीही सर्वच नेत्यांनी आपापल्या भागांमधील निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.