मराठा समाजाची ताकद सरकारला दाखवून देऊ : मराठा क्रांती मोर्चा
सांगली : सांगली येथे आज रविवारी मराठा क्रांती मोर्चा समन्वय क कार्यकर्त्यांची बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात केंद्र आणि राज्य शासन अपयशी ठरले आहे. आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाची ताकद पुन्हा शासनाला दाखवण्यासाठी आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. शिवाय गनिमी कावा पद्धतीने निर्णय घेऊन महाराष्ट्र बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी क्रांती मोर्चातर्फे बैठक घेण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी राज्य समन्वयक विलासराव देसाई यांनी भूमिका मांडली. मुंबईत झालेल्या बैठकीतील निर्णयांचा उहापोह त्यांनी केला. ही स्थगिती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. न्यायालयाचा निकाल येण्याआधी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश दिला. त्यावरूनच राज्य शासनाचा मराठा द्वेष दिसून येतो. यावेळी शंभोराज काटकर नितीन चव्हाण, प्रवीण पाटील, मयूर घोडके, हर्षदा भुजुगडे, डॉ. अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, दिलीप गायकवाड आदींची भाषणे झाली.
