वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा- उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
चक्रीवादळापासून जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासन देखील दक्ष असून राज्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज आहे, आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचे नियोजन झाले आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्याने नागरिकांनी सावध, सुरक्षित राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं घोंघावत येत आहे. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे.
वादळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. तसेच, अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जात असालच तर आपल्या कारमध्ये काचा तोडू शकू अशी वस्तु बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यात हातोडीचा उपयोग करण्यास सांगितले आहे. म्हणून घराबाहेर पडताना कारमध्ये हातोडी ठेवा असे आवाहन पालिकेने केले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज 3 जून 2020 रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या मुंबईतील काही भागात पाऊस सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असं आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे.

