सामनातून आधी टीका करणं आणि नंतर लोटांगण घालणं हे नेहमीचंच – प्रवीण दरेकर
पुणे : राज्यपालांची वारंवार भेट घेण्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून विरोधी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ‘सामना’तून राज्यपालांच्या भेटी घेणाऱ्यांना ‘चक्रम वादळ’ असं संबोधण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सामनातील प्रतिक्रियेला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
आधी टीका करणं आणि नंतर लोटांगण घालणं ही ‘सामना’ची नेहमीचीच भूमिका असल्याचं म्हटलं आहे. विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘सामना’च्या सर्व गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही. ते पंतप्रधानांवर आधी टीका करतात आणि नंतर कौतुक करतात. त्यामुळे सामनातील छापून आलेल्या गोष्टीना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सामना कोण वाचणार, असा प्रश्न असल्यानेच अशी टीका केली जाते.
राज्यपाल हे कुलपती असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि गुणवत्ता टिकली पाहिजे हीच राज्यपालांची भूमिका आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख केला असेल तर आमची पोटदुखी वाढण्याचे काहीच कारण नाही. शेवटी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा खासगी एजन्सीने केलेला सर्वे आहे. असं असेल तर त्यांच्या उत्कृष्टतेचं कारभारात प्रतिबिंब दिसायला हवं, अशीही प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

