मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनलेले पाहायचे आहे. शिवसेनेने केलेला धोका भाजपाशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे. भविष्यात हे तिन्ही पक्ष कायमचे विरोधात बसतील. आपण आता विरोधकांचे काम करू, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. ते भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.
महाराष्ट्राच्या सरकारमध्ये उजव्याला डाव्याचे माहीत नाही. राजकारणात धोका होत असतो. येत्या काळात तिन्ही पक्ष नेहमीसाठी विरोधकांमध्ये जाऊन बसतील. आम्हीच राज्यकर्ते असू, अशा विश्वासही जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.
स्वामिनाथन समितीच्या शिफारसी मोदी सरकारने २०१४ पासून लागू करायला सुरुवात केली आहे. ‘सॉइल कार्ड’ कोणी आणले ? शेतकऱ्यांबद्दल शरद पवार बोलले तर खूप छान आणि मोदी बोलले तर! असा टोमणा त्यांनी शिवसेनेला मारला.
शेतकऱ्यांना एपीएमसीतून मुक्त करू, असे काँग्रेस फक्त सांगायची; आम्ही ते करून दाखवले. आता काँग्रेसचे नेते ट्रॅक्टरवर गादी लावून फिरत आहेत आणि ट्रॅक्टरचा अपमान करत आहेत. आम्ही शेतकरी आणि त्यांच्या नांगराचासुद्धा सन्मान करतो, असे नड्डा म्हणाले.
बैठकीला प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, खासदार प्रीतम मुंडे, रक्षा खडसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. इतर नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिले. जे. पी. नड्डा यांनीसुद्धा व्हिडीओ कॉफरन्सिंगने बैठकीला संबोधित केले आहे. केंद्राने मंजूर केलेला कृषी कायदा, कामगार कायदा तसेच इतर विषयांवर या बैठकीतच चर्चा झाली.
