Politicsराजकारण

शिवसैनिकही देणार राज्यघटनेची प्रत; मागितली राज्यपालांची वेळ

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंदिरं न उघडण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्व विसरले का अशी विचारणा केली. राज्यपालांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही माज्या हिंदुत्त्वाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही असे राज्यपालांना उत्तर दिले. हा पत्रव्यवहार राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजला. राष्ट्रवादी कॉंगेसचे  प्रमुख शरद पवार यांनी राज्यपालांच्या या विधानाचा विरोध करत त्यांना राज्यघटनेची पत्र पाठवली. तर, आता शिवसैनिकही राज्यपालांना राज्यघटनेची प्रत त्यांना भेटून देणार आहे. यासाठी शिवसैनिकाने राज्यपाल भगसिंग कोस्यारी यांची वेळ मागितली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यघटनेची प्रत भेट देण्यासाठी एका शिवसैनिकाने राज्यपालांची वेळ मागितली आहे. त्यासाठी त्याने राजभवनला विनंती अर्ज दिला आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत अजून तरी इंग्रजी भाषेला कोणतेही स्थान नसल्याने आपण हा अर्ज मराठीत लिहित आहोत, असे त्याने आवर्जून नमूद केले आहे.

अॅड. जयेश अनंतराव वाणी असे या शिवसैनिकाचे नाव आहे. त्यांनी अर्जात असे म्हटले आहे की, ‘मी महाराष्ट्र राज्याचा जन्मजात नागरिक असून आजतागायत एकही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. मी कधीही माझ्या मातृभूमीची किंवा छत्रपती महाराजांच्या महाराष्ट्राची बदनामी केलेली नाही. मी भाजपाचा कार्यकर्ता नाही. मी कंगना राणावत किंवा आमदार देवेंद्र फडणवीस किंवा पायल घोष यांच्यासारखा ख्यातनाम नाही. सामान्य नागरिक म्हणून आपली भेट मिळावी यासाठी हा अर्ज करत आहे. आपल्या माहितीसाठी मी एक शिवसैनिक आहे आणि शंभर टक्के हिंदुत्ववादी आहे.’

अॅड. वाणी यांनी अर्जात पुढे म्हटले आहे की, ‘आपण राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र माध्यमांतून वाचण्यात आले. त्या पत्रात आपण माझ्या कुटुंबप्रमुखाला, माझ्या मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिलीत आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष असण्यावर भाष्य केले. कदाचित राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेची व्याख्या आपल्याला पूर्वाश्रमीच्या राजकीय पक्षात चुकीची सांगितली गेली असावी. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण राज्यघटना वाचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच मला राज्यघटनेची प्रत आपल्याला भेट देण्याची इच्छा आहे. 15 ऑक्टोबर रोजी किंवा आपल्या सोयीनुसार मला भेटीसाठी वेळ देऊन राज्यघटनेच्या पुस्तकाची भेट स्वीकारावी.’ असे शिवसैनिक जयेश वाणी यांनी पत्रात म्हटले आहे.

आता राज्यपाल यावर काय प्रतिक्रिया देतात, कोणती वेळ देतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button