भूमिपुत्रांना मिळणार नोकऱ्या ; राज्य सरकार स्थापणार कामगार ब्युरो
मुंबई : कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी परतले आहे . त्यामुळे महाराष्ट्रात अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या नोकऱ्या महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना मिळाव्यात म्हणून राज्य सरकार कामगार ब्युरोची स्थापना करणार आहे.
परप्रांतीय मजूर आपल्या मूळगावी परत जात असल्याने राज्यातील उद्योगांसमोर मोठं संकट उभं ठाकले . महाराष्ट्रातील उद्योगांना मजूर आणि कामगारांची कमतरता जाणवणार आहे. मात्र हीच अडचण राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची संधी घेऊन आली आहे. भूमिपुत्रांना या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे.
दरम्यान राज्यातील उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास विभागातर्फे या कामगार ब्यूरोची स्थापना केली जाणार आहे. या कामगार ब्यूूरोकडे नोंदणी करणाऱ्या कामगारांची कुशल, अकुशल तसंच कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. यानंतर कामगारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि उद्योगांच्या गरजेनुसार नोंदणी केलेल्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

